पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथील घटना.
जामनेर(प्रतिनिधी ):- तालुक्यातील गोंडखेड येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून गावावर शोककळा पसरली आहे.
त्याचे सविस्तर असे की, तालुक्यातील गोंडखेड येथील जयश्री शरद मगर वय ४२ ही महिला दी.१९ रोजी नेहमी प्रमाणे आपले घरातील काम काज करीत होत्या . घरात झाडू मारत असतांना खाली पडलेली वस्तू हाताने उचलून बाजूला करीत असतांना त्यांच्या हाताच्या बोटाला काहीतरी चावले असल्याचे त्यांना समजले, पण त्या ठिकाणी त्यांना काहीच दिसून आले नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने किडा किटकुल किंवा उंदीर चावला असेल म्हणून त्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने त्यांच्या हाताचे बोटे व हाथ सुजून त्यांना वेदना जाणवू लागल्या. घडलेली घटनेची माहिती त्यांनी घरच्या मंडळीना दिल्या नंतर लगेच त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांनी सांगितले की, यांना विषारी साप किंवा तत्सम प्राण्याने चावा घेतला असून त्यांना ताबडतोब जळगांव येथे हलविण्याचे त्यांनी सांगितले.

पुढील उपचारासाठी त्यांना जळगांव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर ३ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार करून सुद्धा त्यांची परिस्थिती सुधारत नसल्याने त्यांना विषारी सर्प द्वंश झाल्याची खात्री घरच्या मंडळीना पटली. मात्र आज उपचारादरम्यानच त्यांचे दी.२३ रोजी दुर्दैवी निधन झाले असून आपण आपल्या घरात सुद्धा सुरक्षीत नसल्याची भावना यावेळी व्यक्त होतांना दिसून आल्या. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून खोंडखेड गावावर शोककळा पसरली आहे.याच दरम्यान कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी घराजवळील परिसर अक्षरशः पिंजून काढला असता त्यांना घराजवळच विषारी साप दिसून आला. सर्प मित्राच्या मदतीने त्याला पकडून लांब जंगलात सोडून दिल्याची माहिती मिळाली असून या विषारी सापामुळे मात्र एका निरागस महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे गोंडखेड गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पच्यात सासू, पती, दोन मुले असा परीवार आहे.


+ There are no comments
Add yours