पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
पाळधी, सुनसगांव, पहूर, शेंदुर्णी येथील शेतकऱ्यांच्या जमीनी होणार संपादीत.
जामनेर :- जालना ते जळगाव या महत्वाकांक्षी विशेष रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रस्तावाचे अनुषंगाने तालुक्यातील पाळधी, सुनासगाव बु.,शेंदुर्णी व पहूर या गावांतील खाजगी शेतजमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर तहसील कार्यालयात दी.२१ रोजी महत्वाची बैठक घेण्यात आली.या बैठकीस जामनेर तहसीलदार, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख जामनेर तसेच नमूद गावांतील शेतकरी उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख निर्देश – मोजणी फी व कार्यवाहीउपअधीक्षक भूमी अभिलेख यांना भूसंपादन प्रस्तावानुसार तातडीने मोजणी फी वसूल करून आवश्यक मोजणी कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश देण्यात आले.व समाईक जमिनीची पोटविभागणी समाईक मालकीतील काही भाग भूसंपादनासाठी संपादित होत असल्यास, संबंधित शेतकरी धारकांनी तहसीलदार जामनेर यांच्याकडे कलम ८५ नुसार आपसी संमतीने पोटवाटणी करून घ्यावी.
तसेच भूमी अभिलेख विभागाकडून पोट हिस्सा मोजणी केली जाणार असल्याने, यामुळे भूसंपादन भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये उद्भवणारे वाद टाळण्यास मदत होईल.तसेच प्रकल्पासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव असल्याने शासनाचा हा महत्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, जामनेर यांनी मोजणीकामासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांनी या वेळी दिले.

प्रकल्पाचे महत्व- जालना-जळगाव विशेष रेल्वे प्रकल्प हा प्रदेशातील संपर्कसुविधा व औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून, शासनाने विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
सदर बैठक व सुनावणीमुळे शेतकरी धारकांच्या सूचना, मागण्या व शंका निवारणास एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून, पुढील कार्यवाहीस गती मिळणार आहे.

+ There are no comments
Add yours