*खोडपे सरांना जनतेतून देणगी मिळत असल्याने जामनेरची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे?*

जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभेचा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला असून माजी मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या पुढे त्यांच्याच तालीमेत तयार झालेले रसायन म्हणजे दिलीप खोडपे सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळवून आव्हान उभे केले आहे. खोडपे सरांची जमेची बाजू म्हणजे त्यांना तालुक्यातील शहरासह गाव खेड्यातील जनतेमधून निवडणूक खर्चासाठी देणगी मिळत असल्याने ही निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याची चर्चा तालुक्यात होतांना दिसून येत आहे. गिरीश भाऊ महाजन यांची गेल्या ३० वर्षापासून तालुक्यावर एक हाती सत्ता असून त्यांच्या विरोधात दिग्गज उमेदवारांनी निवडणूक लढवून हार पत्करली आहे. आज बरेच विरोधक त्यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. त्यामुळे होणारी विधानसभेची निवडणूक गिरीश महाजन यांच्या साठी सोपी व एकतर्फी होईल अशीच व्यवस्था त्यांनी तालुक्यातील विरोधी पक्षाची करुन ठेवली होती. मात्र भाजपच्याच तालीमेत तयार झालेले व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या रुपाने पहिल्यांदाच तालुक्याला लाल दिव्याचा मान मिळवून देणारे दिलीप खोडपे सर यांच्या रुपाने महाविकास आघाडीला एक तुल्यबळ उमेदवार मिळाला आहे. खोडपे सरांची आर्थिक बाजू नक्कीच गिरीश महाजन यांच्या तुलनेत कमकुवत असल्याचे बोलले जात असल्यानेच त्यांना तालुक्यातून देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये क्वचितच अशा काही उमेदवारांना जनतेमधून आर्थिक पाठबळ मिळत असल्याचे उदाहरणे आपण बघीतली आहेत. असेच उदाहरण गिरीश भाऊ महाजन यांच्या बाबतीत सुद्धा १९९५ मध्ये दिसून आले होते असे जाणकार सांगतात. त्यावेळेस सुद्धा ईश्वर बाबूजी जैन यांच्या विरुद्ध निवडणूक लढवतांना गिरीश भाऊ महाजन यांच्या साठी जनतेने पदरमोड करून त्यांचा प्रचार केला होता व त्यांना निवडून आणले होते. तसास प्रसंग आज खोडपे सरांबाबत घडणार काय? कारण त्यांना सुद्धा तालुक्यातील जनतेमधून देणगी स्वरुपात आर्थिक  पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे का? अशी चर्चा तालुक्यात होतांना दिसून येत आहे.महाविकास आघाडीने जामनेर विधानसभेच्या निवडणुकीकडे विशेस लक्ष दिले असून आता पर्यंत खोडपे सरांसाठी मतदार संघातील शेंदुर्णी येथे रोहीत पवार यांची व पहूरपेठ येथे नाथा भाऊ, संजय सावंत व कविता म्हात्रे यांची तर आज दि.११ रोजी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची प्रचार सभा दुपारी ४ वाजता बोहरा सेन्ट्रल स्कूल जळगांव रोड येथे आयोजीत करण्यात आली होती.यात जामनेरचे निलेश लंके यांना विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.गिरीश भाऊ महाजन हे ७ व्यांदा निवडणुकीला सामोरे जात असतांना यावेळेस रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपण विजयी होणार असल्याचे भाकीत केले आहे. आजही शरद पवार यांच्या उपस्थितीत आबासाहेब पाटील यांनी खोडपे सरांना २५ हजार रुपयांचा चेक दिला.देणगीचा ओघ असाच सुरू राहिल्यास जामनेर विधानसभेत काट्याची टक्कर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.घोडे मैदान जवळच असून कोणाचा विजय होईल हे आजच सांगणे कठीण असून येणाऱ्या २३ तारखेला गिरीश भाऊ महाजन व खोडपे सर यांच्यात खरी लढत होत असल्याने कोण बाजी मारेल हे सांगणे कठीण आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours