*मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील ताईंनी केलेल्या पोस्टवर अरविंद पाटील यांची अनोखी श्रद्धांजली पोस्ट व्हायरल.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील ताईंनी केलेल्या पोस्टवर अरविंद पाटील यांची अनोखी श्रद्धांजली पोस्ट व्हायरल.

 जामनेर (प्रतिनिधी):- आज माझ्याकडे काय नाहीये.. गाडी, बंगला आहे. पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल है सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा एक दुसऱ्याशी तुलना करू नका’ मृत्युपूर्वी काही तास अगोदर समाजमाध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे. २८ वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची, २७ फेब्रु.रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता.वडील मनोज आत्माराम पाटील हे ग. स. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा पाटील यांचे शिक्षण एम ए डी.एड होते. कुसुंबा (ता. जळगाव) येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली. समाजमाध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यात पाणी तराळले.

कै. प्रतिक्षा पाटील

आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात. “मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना.. त्याला जीवनाची किंमत कळते. तेव्हा छोटया छोटया गोष्टीमध्ये आनंदी जीवन जगा…” असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा पाटील यांच्या भावनीक पोस्टला जामनेर तालुक्यातील रोटवद येथील अरविंद पाटील यांनी समाजाला जागृत करण्यासाठी व त्यांना अनोखी भावनिक साद घालणारी श्रंदाजली आपल्या पोस्टद्वारे वाहीली. ते म्हणतात..

  सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते… त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही.. तसेच मनुष्य जोपर्यंत देहात आहे.. जोपर्यंत जीव आहे.. तोपर्यंत छान जगा.. जीवन सुंदर आहे.. त्याला आणखी सुंदर बनवा… कारण भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही… आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. … म्हणजेच पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. .. आज काल कोणता दिवस आणि क्षण शेवटचा असेल हे सांगता येत नाही. .. जे प्राप्त आहे पर्याप्त आहे. . त्यात समाधान माना. .. आज ताई आपल्यात नाहीत. . परंतु ताईंनी मरणाच्या काही तासांपूर्वी आपले अंतरात्म्यातील मनोगत शब्दरूपाने लिहून आपल्याला सर्वांना संदेश दिला की, आज माझ्याकडे अमाप पैसा गाडी बंगला सर्व ऐश्वर्य सुख सुविधा असतानाही या जीवघेण्या आजाराने मी हातबल झाले. परंतु ताई तुमचे कायम स्मरण होत राहील. . कारण तुमची मधुर वाणी ,नम्रता ,प्रेमळ गोड स्वभाव सुंदर विचार आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील. . हिम्मत देत राहतील. .. भावपूर्ण श्रद्धांजली ताईसाहेब. अशी पोस्ट व्हायरल करून समाज माध्यमांना सकारात्मक संदेश दिला आहे. त्यांची ही पोस्ट पैसा आणि जीवन यातला फरक स्पष्ट करणारी ठरत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours